आई तुळजाभवानी देवीचे ठाण्याच्या गणेशवाडी -पांचपाखाडी येथे असलेल्या मंदिराचे व्यवस्थापन हे श्री तुळजाभवानी सेवा संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येते. सकाळी अलंकार अभिषेकी पूजा, दुपारी महानैवैध्य, सायंआरती , शेजारती असा दैनंदीं कार्यक्रम या मंदिरात असला तरी नवरात्र उत्सवात मंदिरात अभूतपूर्व भक्तिभाव ओसंडून वहात असतो. घटस्थापना ते विजयादशमी या काळात धार्मिक विधींची रेलचेल असते.नवरात्र उत्सवात दररोज गोंधळ आरती, ललिता पंचमीला सिंहासन महा अभिषेक , अष्टमीला महागोंधळ आणि विजयादशमीला भव्य कुंकुमार्चन सोहळा आयोजित करण्यात येत असतो. या कुंकुमार्चनंतर मंदिर बंद केले जात असले तरी देवीच्या पावलांचे ठसे दुसऱ्या दिवशी भक्तांना पाहवयास मिळत असतात.
पौष महिन्यातील शांकभरी नवरात्र उत्सवही तेवढ्याच उत्साहात साजरा करण्यात येतो. तर त्रिपुरारी पौर्णिमेला या मंदिरात नवचंडी महायज्ञाचेही आयोजन करण्यात येत असते. शिवाय, नित्योपचार पुजा आणि इतर विधींसाठी हे मंदिर सबंध ठाणे- मुंबईत प्रसिद्ध असून भाविकांची मोठी संख्या भगवती चरणी लीन होण्यासाठी येथे येत असते. या मंदिरातील पुजारी आणि व्यवस्थापन मंडळ मंदिरातील विधी संचालनाचे कार्य अत्यंत भक्तिभावाने करीत असते
महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य दैवता म्हणजे आदिशक्ती आई तुळजाभवानी! देशातील 51 शक्तिपीठांपैकी अन् महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. जणू काही याच शक्तीपीठाचे एक रुप ठाण्यात साकारले आहे. आई भगवतीचे ठाण्याच्या गणेशवाडी- पांचपाखाडी येथे असलेले मंदिर आपणां सर्वांना माहित आहे. शारदीय नवरात्रोत्सवात या मंदिरात मुंबई- ठाण्यातील अनेक भाविक येथे येत असतात. हे मंदिर येथील नागरिकांनी उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कालांतराने या मंदिराचे काम रखडले. त्यावेळी आई तुळजाभवानीचे भक्त असलेले डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेऊन साधारणपणे २० ते २१ वर्षांपूर्वी या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. तुळजापूर येथे आई तुळजाभवानीच्या मूर्तीची गळाभेट घडवून आणलेल्या मूर्तीची 2 व 3 मार्च 2004 रोजी विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. मात्र, २०-२१ वर्षांपूर्वीचे हे मंदिर जीर्ण होत चालले होते. शिवाय, भविष्यातील वाढणारी वाहतूक पाहून डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. हे मंदिर थेट तुळजापूरची अनुभूती देणारे असावे, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यामुळे अत्यंत भक्तिभावाने मंदिराच्या उभारणीच्या कामाला त्यांनी सुरुवात केली.
आई तुळजाभवानी देवीच्या मंदिर उभारणीचा पहिला टप्पा होता, जागेचा ! पण भगवतीच्या कृपेने एकही अडचण आली नाही. किंबहुना, आईनेच हे मंदिर साकारून घेतले, असे म्हटले तर ते वावगे थरां नाही.आई तुळजाभवानीच्या नवीन मंदिरासाठी शेजारीच असलेल्या उद्यानातील जागा ठाणे महानगर पालिकेकडून मिळविण्यात आली. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुन हे आराखडा मंजूर करुन घेण्यात आला. शासकीय परवानग्या आणि इतर बाबींची पूर्तता करुन मंदिर उभारणीला सुरुवात झाली. माती परिक्षण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. 18 फेब्रुवारी 2022 रोजी मंदिराच्या बांधकामाचे भूमिपुजन अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले. मंत्रोच्चार, देवतांचे अवाहन, होम-हवन आदी सर्व विधींची पूर्तता करुन हा भूमिपुजन सोहळा पार पडला; अन् प्रत्यक्ष मंदिर उभारणीला सुरुवात झाली.
काळ्या पाषाणातून म्हणजेच कृष्णशिळेतून हे मंदिर साकारले जावे; या मंदिरात आल्यानंतर तुळजापूरच्या मंदिराचा अलवार स्पर्श जाणवावा, अशी मनस्वी इच्छा डॉ. जितेंद्र आव्हाड यांची होती. अन् या इच्छेतून थेट तमीळनाडूचे सेलम अन् आंध्र प्रदेशातील विजयवाडा गाठण्यात आले. तेथील दगडखाणीतून कृष्णशिळा शिव शंकराचे स्थान असलेल्या कर्नाटकातील मुरुडेश्वर येथे आणण्यात आल्या. असेंड क्रियेटीव्हचे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देवाडिगा यांनी या कृष्णशिळांना आकार देण्यास सुरुवात केली.शिखर कळश, नवग्रह, दगडी स्तंभ, आकर्षक कलाकुसर, हत्ती या कृष्णशिळेतून साकारुन ठाण्यात आणण्यात आले काही शिळांना ठाण्यातच आकार दिला गेला. अन् प्रत्यक्ष मंदिर आकाराला येण्यास प्रारंभ झाला.
हजारो टन काळ्या पाषाणाचा वापर करुन ३३ फुटांचा कलश अन् त्यासमोर नवग्रह, प्रवेश कळश, २६ स्तंभ, २० गजमुखांची आरास मंदिरासमोर हवनकुंड, १०८ दिव्यांची दीपमाळ आदींनी सुसज्ज असे हे मंदिर आता साकारले आहे. लोप पावत असलेल्या हेमाडपंथी शैलीला पुन:र्जिवित करीत हे मंदिर साकारले आहे.पाषाणाव्यतिरिक्त अन्य साधनांचा वापर न करता, हे मंदिर उभे केले आहे. आई तुळजाभवानी देवीचे कृष्णशीळेतून साकारलेले हे मंदिर भक्तिमय वातावरणाची अनुभूती देते.