आई तुळजाभवानी

क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती अर्थात अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी अर्थात आई तुळजाभवानी देवी!! श्री स्कंद पुराणात आई भगवतीच्या अवतारकार्याची महती आढळते. एक महान तपस्वी असणारे कर्दम ऋषी यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाण्यास निघाली होती. परंतु, तिच्या गुरूने तिला सती न जाण्यास विनंती केली. तेंव्हा आपल्या पुत्रास आपल्या गुरुच्या स्वाधीन करून ती तपश्चर्या करण्यास बसली. अनुभूती ध्यानस्थ बसलेली पाहून कुकर नामक राक्षसाने तिची तपश्चर्या भंग करून तिचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र तिला त्याची अत्यंत भीती वाटली. ती घाबरून पळत सुटली; कुकर राक्षस देखील तिच्या मागे धावत सुटला. मात्र, कुकर राक्षसापासून वाचण्यासाठी जरी ती धावत असली तरी मनात आई भगवतीचा धाव ती करीत होती. अनुभूतीने आपले पावित्र्य रक्षण करण्यासाठी भगवती मातेचा मनापासून केलेला धावा पाहून आई भगवती अनुभूतीच्या रक्षणासाठी धावूनआली. तिने त्या राक्षसा सोबत युद्ध केले व त्याचा वध केला. आई भगवती आपल्या हाकेला त्वरित धावून आली याचा आनंद तेव्हा अनुभुतीला झाला. तिने देवीला इथल्याच पर्वतात कायमचे वास्तव्यास राहण्याची विनंती केली. त्यावर अनुभूतीच्या विनंतीला मान देऊन त्या पर्वतात देवीने आपले वास्तव्य स्वीकार केले. भक्त अनुभूतीच्या हाकेला त्वरेने धावून येणारी देवी पुढे त्वरीता तसेच तुरजा म्हणून ओळखली जाऊ लागली. काही दिवसांनी या तूरजा शब्दांचे रूपांतर तुळजा असे झाले. तेव्हापासून भगवती मातेला तुळजाभवानी संपूर्ण महाराष्ट्राची कुलदेवता म्हणून प्रसिद्ध असणारी आई भवानी सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करीत असते. आपल्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या भक्ताच्या प्रत्येक संकटात ती सदैव धावून येत असते. वेगवेगळ्या युगात देवीने आपल्या प्रिय भक्तांसाठी अवतार धारण केलेले आहेत. कृत युगात अनुभूतीसाठी, त्रेता युगात श्रीरामासाठी, द्वापार युगात धर्म राजासाठी तर कलियुगात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी देवीचा कृपा-आशीर्वाद नेहमीच राहिला. आई तुळजाभवानी देवी भोसले या राजघराण्याची कुलदेवता होती. छत्रपती शिवराय हेदेखील आई भवानीचे निस्सीम भक्त होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला कुलस्वामिनी मानून, तिची प्रतापगडावरही प्रतिष्ठापना केली होती. भगवान श्रीराम हे आई भगवतीचा वरदायिनी असा उल्लेख करतात. भारतात त्रिगुणात्मक आदिशक्तीची तीन स्थाने 1. महाकाली, कलकत्ता तमोगुणात्मक , 2. श्री महालक्ष्मी, कोल्हापूर रजोगुणात्मक 3. महासरस्वती, माहूर सत्वात्मक प्रसिद्ध आहेत. श्री भवानीचे स्थान त्रिगुणात्मक म्हणजेच वरील तिन्ही अंशाचे अधिष्ठान समजले जाते.

pic